अखेर त्यांना मिळाली ‘ओळख’
बरे झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा लागणार शोध
येरवडाः शहरातील रेल्वे, बस स्थानक, मंदिर, मशीद किंवा दर्ग्यावरील बेघर व मानसिक रुग्णांना विविध स्वयंसेवी संस्थांनी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. त्यांना दाखल करताना संस्थांनी त्यांना विजय, विमल, जॉन, मेरी, अकबर किंवा शबाना अशी नावे दिली. ते उपचार घेऊन बरे झाले, तरीही त्यांच्या कागदपत्रांवर त्यांची ओळख दाखल करतानाचीच नावे राहिली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष प्रयत्नातून मनोरुग्णालयातील बेघर साडेतीनशे रुग्णांचे आधारकार्ड काढले. त्यामुळे त्यांना आता नवीन ओळख मिळाल्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे. यासह बरे झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा शोध लागणार आहे. त्यामुळे रुग्ण त्यांच्या घरी जाऊ शकतात, अशी माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुनिल पाटील यांनी दिली.
डॉ. पाटील म्हणाले , ‘‘येरवडा मनोरूग्णालयांमध्ये साडेचारशेपेक्षा अधिक बरे झालेले रुग्ण आहेत. यातील काही बेघर तर काहींना त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जात नाहीत. त्यामुळे त्यांचा अनेक वर्षांपासून मुक्काम मनोरुग्णालयातच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न मनोरुग्णालय प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, त्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे नसल्याची मुख्य अडचण होती. कारण पुणे रेल्वे स्थानकावर, बस थांब्यावर, मंदिर, मशीद, दर्ग्याजवळील मनोरुग्णांना विविध स्वयंसेवी संस्था, पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने मनोरुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे कोणताच कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे त्यांना संबंधितांनी ज्या नावाने सरकारी कागदपत्रात नोंद केली तीच त्यांची ओळख झाली.’’
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी विशेष बाब म्हणून साडेतीनशे रुग्णांचे आधारकार्ड काढण्याची परवानगी दिली. त्यावर त्यांची रुग्णालयात दाखल असलेल्या नावांचा उल्लेख आहे. मात्र, त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागल्यानंतर आधार कार्डवर त्यांच्या नावाची दुरुस्ती होऊ शकते. आधार कार्डमुळे त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागणार आहे. त्यासोबतच भविष्यात त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुद्धा सुटणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
‘‘सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने मनोरुग्णालयात अनेक वर्षे वास्तव्य असलेल्या रुग्णांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यांना भाजी निवडणे, चहा करणे, बागकाम अशा दैनंदिन कामे शिकविली जाणार आहेत. त्यांची आवड, छंद आणि कौशल्याचा विचार करून त्याप्रमाणे त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी त्यांचे बँकेचे बचत खाते काढण्यासाठी आधारकार्डचा वापर होऊ शकतो.’’
– डॉ. श्रीनिवास कोलाड ,अधिक्षक , येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय