‘एआय’चा वापर शिक्षण क्षेत्रात अपरीहार्य: अॅड. नितीन ठाकरे
मविप्र आयएमआरटी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ परिषदेत प्रतिपादन
नाशिक: आर्टिफीशल इंटेलिजन्स (एआय) हे आजचे टेक्नॉलॉजिकल वास्तव आहे. मानवी प्रगती आणि व्यवसायिक उत्क्रांतीसाठी एआयचा उपयोग उपयुक्त ठरतो आहे. शिक्षण, व्यवसाय, संरक्षण, न्यायदान, वैद्यकीय अशा सर्व क्षेत्रात एआय वापरले जात आहे. हे तंत्रज्ञान वास्तव मान्य करून व कोणतीही भीती न बाळगता ‘एआय’चा वापर समजून घेऊन तो सर्व क्षेत्रांत वाढवावा. ‘एआय’ शिक्षण क्षेत्रात अपरीहार्य गरज आहे असे प्रतिपादन मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी आपल्या उद्घाटन भाषणात केले. मविप्र संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आयएमआरटी) व असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (एआयएमएस) यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूररोडवरील आयएमआरटी महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावर आयोजित दोन दिवसीय व नवव्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत देशभरातील तज्ज्ञ, व्यावसायिक, उद्योजक व शिक्षण क्षेत्रातील तज्ञ तसेच विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
एआय’ शिक्षणासाठी वरदान: डॉ. एस. एस. साने
शिक्षणसंस्था आता फक्त माहितीच्या संग्रहालयात रूपांतरित होत आहेत हे बदलायला हवे. मोबाईल व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ला विरोध करणाऱ्यांना युवा पिढी शत्रूसमान समजू लागली आहे. प्राध्यापकांनी आपली शिकविण्याची पद्धत व भूमिका माहिती पुरवणारे न राहता मूल्याधिष्टीत असायला हवी. एलएलएम (लार्ज लँग्वेज मॉडेल) मुळे चॅटजीपीटीला स्वतःहून विचार करण्याची संधी मिळू शकते आणि तसे झाले तर माणसाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. व्यवसायात एआय मोठे बदल करीत मधल्या फळीतील लोक संपतील. मानवी भावना नियंत्रित करण्यासाठी पुढील ४० वर्षांत एआय सज्ज होऊ शकतो. ‘एआय’ शिक्षणासाठी व व्यवसायासाठी वरदान आहे असे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एस. सपट इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिरीष साने यांनी आपल्या बीजभाषणात बोलत होते.
प्रास्ताविक संयोजक डॉ. संजय गायकवाड यांनी केले. स्वागत आयएमआरटी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत सुर्यवंशी यांनी केले तर डॉ. डॉ. गिरीश अहिरे यांनी आभार मानले. व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. मधुलिका सोनवणे, मविप्र शिक्षणाधिकारी डॉ अजित मोरे हे उपस्थित होते. परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. दीपक नांद्रे, डॉ. प्रवीण रायते, डॉ. जयश्री कदम आदींनी परिश्रम घेतले.