कुटुंबाने नाकारले ; त्यांनी स्विकारले
विविध स्वयंसेवी संस्थांनी १७७ रुग्णांचे घेतले पालकत्व ; २३ रुग्णांचे कुटुंबात पुनर्वसन
पुणे : येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात साडेतीनशे पेक्षा अधिक बरे झालेले रुग्ण आहेत. यातील काही बेघर तर काहींना त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जात नसल्यामुळे त्यांचा मुक्काम मनोरुग्णालयातच आहे. मानसिक आरोग्य कायदा ( मेंटल हेल्थ ॲक्ट) अंतर्गत रुग्णांचे पुनर्वसन बंधनकारक आहे. शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांनी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मदतीने १७७ बरे झालेल्या मनोरुग्णांचे पालकत्व स्विकारले आहे. तर २३ रुग्णांना घरी पाठविले आहे. रुग्णालातील समाजसेवक, कर्मचाऱ्यांनी २०१ रुग्णांचे गेल्या सहा महिन्यात पुनर्वसन केल्याची माहिती, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाते अधिक्षक डॉ. सुनिल पाटील यांनी दिली. बरे झालेले रुग्ण आपले उर्वरित आयुष्य समाजाच्या मुख्य प्रवाहाबरोबर जगणार असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र बेघर व ज्यांचे नातेवाईक त्यांना घरी घेऊन जात नसल्यामुळे त्यांचा मुक्काम मनोरूग्णालयातच आहे. रुग्णालयातील कर्मचारी रुग्णाला घेऊन घरी गेल्यास नातेवाईक स्विकारत नाहीत. अनेकांनी घर बदलले आहे. रुग्णाच्या नावे जमिन, फ्लॅट, शेती आहे. मात्र, त्याचा उपयोग रुग्णाला होत नाही. यासह नातेवाईक त्यांना स्विकारतच नाही. यामध्ये कायदेशीर मदत घेण्यासाठी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाने सिंबायोसिस लॉ कॉलेज सोबत सामंजस्य करार केला आहे. या कारारा अंतर्गत ‘सिंबायोसिस’ लॉ कॉलेज रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला घेऊन जाण्यासाठी समन्स देणे, रुग्णाला घरी जाण्यासाठी कायदेशीर प्रकि्या राबविणे,रुग्णाला घरी स्विकारण्यासाठी नातेवाईकाला कायद्याने भाग पाडणे, रुग्णांच्या नावावर असलेली शेती, घर, फ्लॅट ( प्रॉपर्टी) संरक्षित करणे, रुग्ण व नातेवाईक यांच्यामध्ये मानसिक आरोग्य कायद्या बाबत जनजागृती करणे आदी कायदेशीर कामे मोफत करीत आहे. यासह ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण’ सुद्ध मदतीला आहे. त्यामुळे रुग्णांचे पुनर्वसन मोठ्या प्रमाणात होत आहेत.
शहरातील चैतन्य फाउंडेशनने व जागृती संस्थेने प्रत्येकी ५० बरे झालेल्या रुग्णांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे. किनारा संस्थेने ६५, मनोभ्रम (संवाद) संस्थेने बारा तर श्रद्धा संस्थेने तीन बरे झालेल्या मनोरुग्णांचे पालकत्व स्विकारले आहे.
‘‘ गेल्या सहा महिन्यात विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १७७ रुग्णांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तर बरे झालेल्या २३ रुग्णांना त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात आले आहे. यासह आणखीन मनोरूग्णांचे पुनर्वसन टप्प्या टप्प्या करीत आहे. ’’
– डॉ. श्रीनिवास कोलाड , अधिक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरूग्णाल
‘‘ मनोरुग्णालयातील अंतररुग्ण विभागातील रुग्णांना मनोरुग्ण तज्ज्ञांकडून तपासून घरी पाठविण्याकरीता ठेवले जाते. मात्र, रुग्णांचे नातेवाईक रुग्णाला वर्षानुवर्ष घरी घेऊन जात नाहीत.त्यामुळे रुग्णालयातील लीगल सेलच्या माध्यमातून रुग्णाला घरी पाठविण्यासाठी सरकारी वकिलाची मदत होऊ शकते.’’
– भाऊसाहेब माने, सामाजसेवा अधिक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय
मनोरुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांना दैनंदिन कामे करण्यास अडचण
येरवडा मनोरुग्णालयात गेली अनेक वर्षे उपचार घेणाऱ्या रुग्णांना दैनंदिन कामे करण्यास अडचण येते. चहा बनविणे, भाज्या निवडणे, घरातील दैनंदिन कामे करण्याचे ते विसरले असतात. बसमध्ये प्रवास करणे, तिकिट काढणे, बाजारहाट करणे अशा गोष्टी त्यांना अनोळखी असतात. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन संस्थांमध्ये झाल्यामुळे ते दैनंदिन कामांसह इतर अनेक गोष्टी शिकू शकतात. हे खऱ्या अर्थाने रुग्णांचे पुनर्वसन असल्याचे रुग्णालयातील सामजसेवकांनी सांगितले.
रुग्णांचे पालकत्व घेणाऱ्या संस्थांची वारंवार करावी लागणार पाहणी
केंद्र व राज्य सरकारकडून बरे झालेल्या रुग्णांचे पुनर्वसनासाठी घेतलेल्या स्वयंसेवी संस्थांना अनुदान असणार आहे. त्यामुळे येथे रुग्णांना केवळ चहा, न्याहरी व जेवण न देता, इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. यासह त्यांना विविध व्यवसायभिमुख कौशल्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थांची वारंवार पाहणी करून त्यांना सुचना देणे आवश्यक असल्याचे मत काही संस्थांचे आहे.