कृत्रिम बुद्धिमत्तेतून हरित कृषी क्रांतीची नवी पहाट
जगभरात आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात स्थित्यंतरे होत असताना शेतीदेखील याला अपवाद ठरू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – एआय), ड्रोन तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग आदींसह नवकल्पनांना प्रत्यक्ष रूप देत अनेक ‘स्टार्टअप’ या क्षेत्राच्या विकासासाठी उदयास येत आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना आणि शेतीला निश्चितच फायदा होणार आहे.
अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ जॉन मॅकार्थी यांनी १९५५ मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धीमत्ता) ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. बुद्धिमान यंत्रे बनविण्यासाठी विज्ञान- तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर अशी या तंत्रज्ञानाची व्याख्या त्यांनी केली होती. अर्थात माणसाप्रमाणे कार्यान्वित होणारी बुद्धिमत्ता संगणकीय प्रणालीद्वारे तयार करुन अपेक्षित कार्य साध्य केले जाते. त्याला बुद्धिमत्ता म्हणून विचारात घेतले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता रिमोट सेन्सिंग, ब्लॉक चेन, जीआयएस तंत्रज्ञान, रोबोटिक्स, ड्रोन, आदीतुन शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज, माती आणि पीक आरोग्याचे विश्लेषण आणि भविष्यसूचक विश्लेषणातून अचूक शेती आदी बाबींतून कृषी परिसंस्थेचे स्वरुप बदलते आहे.
भारत जगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत १४ व्या क्रमांकावर आहे. जागतिक नवप्रवर्तक देशाच्या निर्देशांकामध्ये १३२ देशाच्या यादीत आपल्या देशाचा ५० वा क्रमांक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीतील बहुतांश आव्हाने कमी करू शकते. एकंदरीतच डिजिटल पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाविषयी जागरुकता यासह प्रशिक्षणाला चालना यावर अधिक भर देऊन पुरेशा गुंतवणुकीतून सदाहरित कृषी क्रांतीची पहाट निश्चित होईल.
शेतीसाठीच्या पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन, पीकबदल, पोषण व्यवस्थापन, काढणी व काढणीपश्चात नियोजन आणि बाजारपेठेचे विश्लेषण आदींबाबत डिजिटल तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शेती अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि शाश्वत करण्यास निश्चितपणे मदतीचे ठरणारे आहे.
हरितक्रांतीतून देशाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी, कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका या शेती तंत्रांच्या पलिकडे विस्तारत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता कृषी संसाधनांच्या पर्याप्त वापराबरोबरच पर्यावरणीय स्थितीचे आरोग्य देखील सुस्थितीत राखण्यास साहाय्यक ठरु शकते. जगभरातील वाढत्या लोकसंख्येसोबतच वाढती अन्न उत्पादनाची मागणी विचारात घेता पारंपरिक शेती पद्धतीच्या पलिकडे ए.आय. सारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानातून कृषी परिसंस्थेमध्ये बदल होत आहेत.
हवामान बदल, लोकसंख्येची वाढ आणि संसाधनांची कमतरता यासारख्या जागतिक आव्हानांमुळे नवकल्पनांसह नवनवी कृषीतंत्रे अधिकाधिक आवश्यक होत आहेत. याचा पिकांवरील रोग ओळखणे, स्वयंचलित तण नियंत्रण प्रणाली, पशुधन आरोग्य निरीक्षण, पीक उत्पन्नासाठी अंदाजात्मक विश्लेषण, अचूक सिंचन प्रणाली, ड्रोनच्या साहाय्याने हवाई पाळत ठेवणे, पुरवठा साखळी सक्षमतेसह आणि मागणी अंदाज आदी बाबींतून शेती पद्धतींमध्ये क्रांती घडत आहे.
भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ॲग्रिस्टॅक तयार करण्याची योजना आखली आहे. डिजिटल कृषी मिशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक चेन, रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस तंत्रज्ञान, ड्रोन आणि रोबोट्सचा वापर आदी नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पासाठी सरकारने सार्वजनिक आणि खाजगी सहभागातून २०२१-२०२५ साठी ही सुरुवात केली आहे.
हरितक्रांतीतून देशाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी, कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका या शेती तंत्रांच्या पलिकडे विस्तारित आहे. सन २०२३ मध्ये कृषी बाजारातील जागतिक कृत्रिम बुद्धिमत्तेचे मूल्य १.८२ अब्ज डॉलर होते, ते २०२४ पर्यंत १२.४७ अब्ज डॉलर वाढण्याचा अंदाज आहे. भारताचे २०२४ मधील कृत्रिम बुद्धिमत्तेचे बाजारमूल्य ५५.१७ दशलक्ष डॉलर असल्याचे दिसते. संसाधनांचे संरक्षण आणि हवामान बदल कमी करणे, शेतीला भविष्यासाठी अधिक अनुकूल आणि लवचिक बनवणे यासारख्या हे नव तंत्रज्ञान सध्याची शेती व्यवस्थेत आमूलाग्र बदलाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका निश्चितपणे निभावेल.
या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतीसाठी द्यावा लागणारा वेळ, पैसा, पाण्याची आणि खतांची बचत होईल, तसेच मनुष्यबळ कमी लागेल. शेतीबाजारपेठेचे विश्लेषण करून, पीक उत्पादनाचा अंदाज लावून योग्य किंमत धोरण निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ज्यामुळे शेतकऱ्यांना माहितीपूर्ण व्यवसाय निर्णय घेण्यास मदत होईल. आज कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्यासाठी आणि ग्राहकांना त्यांची उत्पादने थेट विकण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील. याशिवाय कृषी पर्यटनासारख्या मूल्यवर्धित सेवांच्या विकासामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव-नव्या संधी निर्माण होतील यात शंका नाही.