तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर- उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
पुणे: आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक करणे ही काळाची गरज आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात ‘एआय’च्या वापरासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर शेतीला थेट फायदा होईल. ऊसाच्या शेतीतसह इतरही पीकांकरीता ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिन व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या, महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांना अभिवादन करुन संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात योगदान दिलेल्या महाराष्ट्रवीरांच्या त्यागाला वंदन करतानाच त्यांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
भारत चोख प्रत्युत्तर देईल…
पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले, त्यात पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा समावेश होता. या दहशतवादी हल्ल्यात जीव गमालेल्या सर्व भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति सहसंवेदना व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत या भ्याड हल्ल्याला लवकरच चोख प्रत्युत्तर देऊन दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना कायमची अद्दल घडवेल. या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने सामाजिक सलोखा, शांतता, बंधुता, ऐक्य कायम राखावे, ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.
जातनिहाय जनगणना करण्याची मागणी अनेक व्यक्ती, संस्था, संघटनांची गेल्या अनेक दशकांपासून करण्यात येत होती. त्याअनुषंगाने कालच केंद्रीय मंत्रीमंडळाने जातनिहाय जनगणना करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे सर्व समाज घटकांना न्याय्य हक्क मिळण्यास मदत होईल. केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करुन संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो.
विकसित भारत, विकसित महाराष्ट्र…
देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असलेल्या महाराष्ट्राचा देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपी) साडे तेरा टक्के इतका वाटा आहे. या पार्श्वभूमीवर, विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2025-26 या आर्थिक वर्षाचा सात लाख वीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पूर्वानुभवाच्या बळावर राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करण्याचा कसोशीचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.