नाट्य परिचय: वरवरचे वधू- वर
‘वरवरचे वधू-वर’ : यशस्वी लग्नासाठीचा प्रयोग
एव्हाना ‘लग्न’ ही घटना आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना आहे, यावर समाजाच्या एका मोठ्या वर्गाचा विश्वास उडू लागला आहे. याला मुख्य कारण एकच आहे; ते म्हणजे प्रत्येकाला आलेले प्रचंड आर्थिक स्वावलंबित्व. दुसरीकडे लग्न या संस्थेला आज आलेले व्यावसायिक स्वरूप हेही त्याचा आशय हरवण्यास कारणीभूत होत आहे. या सुंदर संस्थेचा आलेख ‘गंधर्व विवाह’ ते ‘कॉन्टॅक्ट मॅरेज’ व्हाया ‘लिव्ह ईन रिलेशनशिप’ असा ढासळत गेला आहे. परिणामी ‘पिरियॉडिकल’ आणि ‘ट्रायल मॅरेज’ हेही आता लवकरच येऊ घातले आहेत. ‘वरवरचे वधू-वर’ हे नाटकही याच वळणाने जाते की काय, ही आशंका होती; पण ती सपशेल फोल ठरली. दोन विवाहोत्सुकांनी लग्नानंतर संसारात येणाऱ्या संभाव्य समस्यांवरील शोधलेल्या उपायांचे प्रात्यक्षिक म्हणजे हे नाटक आहे. लग्नाळू लोकांसाठी हे नाटक नक्कीच आदर्श असे म्हणावे लागेल.
भावी जीवनसाथीकडून असलेल्या (कधी कधी अवास्तव!) अटी-अपेक्षा यांबाबत ‘कन्फ्युज’ झालेल्यांची संख्या समाजात वाढती आहे. यात प्रारंभीच्या काळात केलेल्या चुकीच्या व खोट्या प्रदर्शनातून बरीच नाती बिघडतात, विस्कटतात. ‘वरवर’चेमधून अशा उमेदवारांना महत्त्वाचा संदेश आणि मार्गदर्शन मिळेल अशी खात्री आहे.
या दोन अंकी नाटकाची कथा अगदी थोडक्यात आहे. समान कार्यक्षेत्र असलेले दोन लग्नाळू उमेदवार कामानिमित्त एका गावात एका हॉटेलमध्ये एकत्र येतात आणि त्यांच्या नाम साधर्म्यामुळे सुरुवातीला गोंधळ आणि नंतर या योगायोगाची रोमांचकता वाढलेली दाखवली आहे.
कु. विशाखा मोहित माने (सखी गोखले) ही उच्चशिक्षित तरुणी तिच्या कंपनीच्या व्यावसायिक कारणासाठी पाचगणी येथे एका हॉटेलमध्ये उतरते. मोबाईलवरून तिच्या मम्माशी असलेली कनेक्टिव्हिटी सतत जाणवत राहते. उपवर असल्याने वर संशोधन हा तिचा स्वतंत्र ‘टास्क’ आहे. त्यामुळे संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाबाबतच तिची मम्मा त्या अँगलने संशोधन करू पाहत असते! यामुळेच इथे वैतागून आपण एकटे नाही हे भासवण्यासाठी विशाखा हॉटेलच्या तरुणास ती विवाहित असल्याचे खोटेच सांगून टाकते आणि पुढील गमतीशीर प्रसंगांना खत पाणी मिळते. थोड्याच दिवसात तिच्याच कार्यक्षेत्रातील एक अविवाहित तरुण नामे (चक्क!) मोहित माने (सुव्रत जोशी) हा त्या हॉटेलमध्ये रूममध्ये उतरतो आणि गमती जमती- समजूती सुरू होतात होतात.
कर्मधर्मसंयोगाने त्यांना एकत्र राहावे लागते आणि दोघांचीही लग्न ही ‘बेसिक समस्या’ एकमेकांना समजते. आपल्याला येणाऱ्या होकार नकारापासून ते लग्नाच्या अगोदर लोक करत असलेले खोटे प्रदर्शन याबाबत विस्ताराने दोघांत गप्पाष्टक झडते. लग्नानंतर सगळे खोटे कसे उघड होते आणि संसाराला कसे तडे जातात याचीही यातून त्यांना जाणीव होते. म्हणून लग्नाच्या अगोदरच भावी संसारात कसे जीवनमान असेल याचे एक प्रात्यक्षिकच दोघात सुरू होते. थोडक्यात ते वरवरचे वधू-वर असल्यासारखे राहायचे ठरवतात.
ह्या लग्नप्रयोगात दोघांत संसारातील वेगवेगळ्या विषयांवरून भरपूर भांडणं होतात; पण प्रत्येक भांडणानंतर दोघे अंतर्मुख होऊन विचार करतात व आपण कसे, कुठे चुकीचे आहोत हे जाणतात. परिणामी दोघांमध्ये नैसर्गिक न्यायाप्रमाणे भावनिक बंध तयार होऊ लागतात. तोच विशाखाच्या मनात भरलेले व तिला हवे तस्से एक स्थळ चालून आल्याचा फोन तीची मम्मा करते. या स्थळाने होकार कळवला असल्याने विशाखा पहिल्या क्षणातच आनंदते; पण नंतर तिच्या मनात गेल्या दोन महिन्यांची उजळणी सुरू होते. या बातमीने मोहित ही मनातून प्रचंड निराश होतो, दुखावतो. लग्न नाट्यातील ठरलेल्या तिसऱ्या भांडणात “तू असं कसं करू शकते” असे मोहित तिला कळवळीने विचारतो. पुढे काय?
हा अभिनव लग्नाचा प्रयोग सोडून विशाखा सुखेनैव आयुष्यासाठी निघून जाते का? मोहितलाही दुसरा उत्तम पर्याय गवसतो का? की हे वरवरचे वधू-वर खरेखुरे वधू-वर बनतात हे प्रत्यक्ष पाहण्यातच मजा आहे!
अनेक सन्माननीय पुरस्कार मिळवलेल्या या नाटकाने शंभरावा प्रयोग गेल्याच महिन्यात मोठ्या उत्साहात नाट्यमंडळींचे पुण्यातील ‘तीर्थक्षेत्र’ बालगंधर्व रंगमंदिर येथे साजरा केला. प्रेक्षकांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता हे नाटक ‘यशस्वी नाटक’ म्हणून नावारूपाला येत आहे. अवघ्या तीन कलाकारांनी हे नाटक समर्थपणे पेलले आहे.
सुरज जोशी हा एक परिचित लोकप्रिय अभिनेता या नाटकातून भेटीला आला आहे. त्याने साकारलेला ‘ममाज बॉय’ आणि लग्नाळू प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.
सखी गोखले ही अत्यंत गुणी व आश्वासक अभिनेत्री असल्याचे तिच्या ‘विशाखा’ने दाखवून दिले आहे. ही स्वतंत्र विचारांची आणि स्वावलंबी तरुणी व्यावहारिक पातळीवर दृष्टिकोन ठेवता ठेवता भावनिक पातळीवर कशी येते हे तिने अभिनयातून छान दाखवले आहे. प्रसंगी ती प्रेक्षकांना भावुकही करते.
या नाटकात नायक-नायिका यांच्यात बऱ्याच प्रसंगात खटके उडत राहिल्याने संवादात उच्चरव राखावा लागणे स्वाभाविक आहे; तरी आवाजी अभिनयावर त्याचा परिणाम होऊ नये याची थोडी काळजी घ्यावी असे वाटते.
नाटकाचा प्रारंभ दिग्दर्शकाने आपल्या कल्पकतेतून थोडा वेगळा केला आहे. या नाटकात दिग्दर्शकाने सूत्रधाराची (सुरज पारसनीस) नेमणूक केली आहे. पडदा उठण्यापूर्वी प्रेक्षकांतून मुशाफिरी करत या सूत्रधाराने प्रारंभी केलेला संवाद मन जिंकणारा आहे. शिवाय संपूर्ण नाटकात हाच सूत्रधार-कम- हॉटेलमधील सहाय्यक नामे- ‘पांडा’ ‘वधू-वर’चा वेग-आवेग मध्यस्थी करत कायम ठेवतो.
नाटकातील नियोजित वधू हिनेदेखील प्रेक्षकांतून धमाल एन्ट्री करून मंचावर आल्यावर आपले रूपडे उघड केले आहे.
या नाटकाने दोन ठेकेदार गाणीही दिली आहेत. यातील एक ख्यातकीर्द गायक सुमित राघवन यांनी गायले आहेत. आजकाल नाटकात गाणी आणि नृत्याचीही फोडणी देण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना नवा असला तरी तो बऱ्यापैकी आवडत आहे. प्रेक्षक या नव्या बदलाला एन्जॉय करत आहेत. येथे संगीत निषाद गोलांबरे यांचे असून, नृत्य फुलवा खामकर यांनी फुलवले आहे. वेशभूषा- कल्याणी कुलकर्णी- गुगळे, रंगभूषा- सौरभ कापडे आणि राजेश परब, तसेच सहाय्यक दिग्दर्शक अमेय रुद्र हे आहेत.
‘वरवरचे वधू-वर’ची निर्मिती ‘कला कारखाना’ची असून, हे नाटक ‘शांताई’ने प्रकाशित केले आहे. लेखक दिग्दर्शक विराज कुलकर्णी यांची ही पुरस्कारप्राप्त लेखणी नक्कीच भावणारी आहे. खटकेबाज हजरजबाबी संवाद वेळोवेळी हशा व टाळ्या वसूल करतात.
‘लग्न’ या विषयावर भाष्य करणारे हे नाटक लग्नाळूच नव्हे तर संसाराला नुकत्याच ‘जुंपलेल्या’ जोडप्यांसाठीही अत्यंत उदबोधक आणि मार्गदर्शक ठरू शकते. म्हणून सहकुटुंब या नाटकाच्या आनंद लुटला पाहिजे. म्हणूनच ते ‘चुकवू नये असे काही’ या सदरातीलच आहे.
-गिरीश प्रभाकर कुलकर्णी
सिने-नाट्य समीक्षक