माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुणे हे शहर वाचनसंस्कृती आणि खाद्यसंस्कृती असलेले आहे. या जत्रेमध्ये येथे बालकांसाठी खेळ येथे पाहायला मिळाले. खेळांमुळे एकाग्रता वाढते, शारीरिक क्षमता वाढतात. आम्हाला आई वडिलांनी पुस्तकांची खूप आवड लावली. पुण्यात पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. वाचन संस्कृती कितीही पुढे गेली आणि आज लॅपटॉप, संगणक आदींवर पुस्तके वाचायला मिळत असली तरी पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा, पुस्तकाचा स्पर्श हाताला होऊन ते वाचणे याच्यामध्ये खूप वेगळी मजा आहे, असे सांगून हा उपक्रम राबविल्याबद्दल मिसाळ यांनी राजेश पांडे यांचे अभिनंदन केले.
मिलिंद मराठे म्हणाले, येणाऱ्या काळात पुण्याच्या पुस्तक महोत्सवाच्या यशस्वीततेनंतर नागपूर आणि मुंबई येथे पुस्तक महोत्सव भरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासामार्फत ग्रंथालयांचे जाळे (नेटवर्किंग ऑफ लायब्ररीज) निर्माण करणे आणि समुदाय ग्रंथालयांची सुरूवात (इनिशिएशन ऑफ कम्युनिटी लायब्ररीज) याचा एक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात कम्युनिटी लायब्ररीचे जाळे निर्माण करून त्यातून वाचन संस्कृती वाढावी असा प्रयत्न यातून होणार असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात राजेश पांडे म्हणाले, आजकाल वाचन कमी झाले आहे असे म्हटले जाते. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यातून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या साहित्य जगताला, प्रकाशक जगताला अतिशय ऊर्जा मिळाली. दिल्लीतील राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनाला मुलांचा प्रतिसाद पाहता पुण्यातही असा उपक्रम राबविण्याची संकल्पना समोर आली. त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात येत असून कदाचित भारतातील पहिलाच असा बाल जत्रेचा उपक्रम असेल, असेही ते म्हणाले.
प्रारंभी मंत्री पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी देऊन पाहणी करून स्टॉलधारकांशी संवाद साधला. मुलांचे खेळ पाहतानाच स्वत: त्यांनी विटी-दांडू हाती घेऊन खेळाचा थोडा आनंद घेतला. राज्यमंत्री मिसाळ यांनी लगोरी खेळाचा आनंद लुटला.
यावेळी पालक, लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. पुस्तके हातात घेताना होणारा आनंद बालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खेळांचा आनंदही त्यांनी मनमुराद लुटला.