मी आधार समजावं कुणाला..?
कारागृह म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभे राहत एक वेगळं जग. गजाआड कोंडला गेलेला, हातात बेड्या अडकवलेला एक जीव आणि त्यातच जेव्हा येरवडा कारागृहाचा उल्लेख केला जातो, तेव्हा शरीराचा थरकाप उडल्याशिवाय राहत नाही. येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे नाव ऐकलं की एक नाही अशी अनेक कुप्रसिद्ध कैद्यांची नावे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्यांच आयुष्य, त्यांच राहणीमान, त्यांना मिळणारे जेवण अशा अनेक विषयांवर आपण विचार करू लागतो. पण कैदी कारागृहात कैद असताना त्याच्या कुटुंबीयांचे होणारे हाल, यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो.
सहजच एक चक्कर मारावी म्हणून येरवडा मध्यवर्ती कारागृह समोरील जागेत वड आणि चिंचेच्या झाडाखाली कैदेत असणाऱ्या आपल्या मुलाला, नवऱ्याला किंवा मित्राला भेटण्यासाठी वाट पाहणाऱ्या नातेवाईकांमध्ये जाऊन बसलो. खरंतर ते एक विदारक चित्रच होतं. रुग्णालयात ऑपरेशन थेटर बाहेर जसे नातेवाईक रुग्णाला भेटण्यासाठी वाट बघत उभी असतात, अगदी तसंच काहीसं चित्र मला या ठिकाणी दिसत होतं. असं वाटत होतं जणू कारागृहाच्या भिंती पल्याड एक वेगळं जग आणि भिंतीच्या अलीकडे एक वेगळंच जग होतं.
चिंचेच्या झाडाखाली एक आजोबा ताटकळत किती वेळ उभे होते. सुरकुत्यांनी पिकलेला त्यांचा चेहरा बरच काही सांगून जात होता. माझ्या उतार वयात अजून किती दिवस मला या कारागृहात चकरा माराव्या लागतील, हा एकच सवाल जणू त्यांना छळत होता. त्याच आजोबांच्या शेजारी स्वच्छ पांढरा शुभ्र शर्ट घालून एक व्यक्ती उभी होती. कदाचित ते काका त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी आले असावेत. त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता मी अगदी स्पष्टपणे पाहू शकत होतो. आपल्या मुलाप्रती वडिलांच्या मनात काय चालू असतं, या विचारानेच मी ” ते त्यांच्या मुलासाठी आले असावेत ” असा अंदाज लावला.
हे सगळं निरीक्षण सुरू असताना, कैद्याचं नाव आणि कैदी नंबर पोलिसांकडून उच्चारला जात होता. झाडाच्या एका आडोशाला एक बाई आपल्या मुलाला घेऊन बसली होती. तिच्या चेहऱ्याकडे पाहून “अजून किती दिवस..??” हा विचार झळकत होता. एका गुन्ह्यामुळे नकळत्या वयात सुद्धा एका मुलाला त्याच्या आई सोबत कारागृहात यावं लागतंय, यासारखं दुर्दैव त्या मुलासाठी दुसरं काय असू शकते. त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरचं गोंडस निरागस हसू पाहून चलबिचल होणारं माझं मन थोडं शांत झालं.
आपल्या मुलाचं कधीतरी नाव उच्चारलं जाईल आणि आपण आपल्या मुलाला डोळे भरून बघू, अशी भावना मनाशी बाळगून एक म्हातारी आजी उन्हात रस्त्याच्या कडेला बसली होती. एक पोलीस अधिकारी तिथे आला आणि आजींना सावलीत बसण्याची विनंती केली. खरंच कैद्यांना दंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा कैद्यांच्या नातेवाईकांचा त्रास जाणवत असेलच हे स्पष्ट झालं. “माझ्या लेकाचं नाव कधी येईल.” आजींनी अशी विचारणा केली असता, त्या पोलीस अधिकाऱ्यांनी “लवकरच येईल, थोडं थांबा” असा विश्वास त्या आजींना दिला.
ही सगळी गर्दी ज्या चिंचेच्या झाडाखाली आपापल्या माणसाची वाट बघत उभी होती, त्यांच्यासाठी हे चिंचेचं झाड जणू आधारवडाचंच काम करत होतं. ठिकठिकाणी धर्म आणि जात पाहणाऱ्या नजरा त्या ठिकाणी मात्र एकाच काचेतून पाहतात. फक्त पाच मिनिटांच्या भेटीसाठी लोक अक्षरशः राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात. आणि तेव्हाच क्षणिक भेटीची किंमत लक्षात येते. बोलणं झालं नाही तरी चेहरा बघूनच मनाला समाधान द्यावं लागतं. कारण कैदी आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये होणारा संवाद हा शाब्दिक नाही तर भावनिक असतो. हा संवाद ओठातून नाही तर डोळ्यातून असतो.
गुन्हा करणारा करून जातो, मग तो जाणीवपूर्वक असो किंवा नकळत केलेला असो. पण त्यामागे त्याच्या कुटुंबाची होणारी फरफट ही फक्त कुटुंबातील सदस्यच समजू शकतात. आपण आपली ओळख कशी लपवावी, का लपवावी, कोणासाठी लपवावी हा सवाल त्या कुटुंबीयांना नक्कीच छळत असेल. जेव्हा घरातला कर्ता पुरुष तुरुंगात जातो, तेव्हा रस्त्यावर आलेल्या कुटुंबाला ते वड आणि चिंचेचं झाड सुद्धा खूप मोठ्या आधारासारखंच वाटत असेल, हे नक्कीच
स्वप्निल अनंत काळे
प्रतिनिधी, दैनिक महामेट्रो