
वृक्ष दिंडीची’ पंढरपूर येथे सांगता
महाराष्ट्र वृक्ष वेलींनी बहरावा
माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचे प्रतिपादन
पंढरपूर : नरसी नामदेव (हिंगोली) ते पंढरपूर दरम्यान वृक्ष,संत साहित्य,शेतकरी या विषयावर जनमानसात जागृती करण्यासाटी वृक्ष दिंडीची’ पंढरपूर येथे सांगता झाली. महाराष्ट्रातील शिक्षक,साहित्यिक, समाजशील तरुण गेल्या अनेक वर्षापासून निसर्ग शाळेच्या माध्यमातून पर्यावरण संदर्भात जनजागृती करीत आलेले आहेत. याचाच एक भाग म्हणून उन्हाळी सुट्यांचा काळात लोक प्रबोधन करण्यासाठी ह्या निसर्गप्रेमी शिक्षकांनी ३ मे पासून पायी वृक्ष दिंडी आयोजित केली होती. हि दिंडीचा प्रारंभ संत नामदेव महाराज यांचे जन्मगाव नरसी (जिल्हा हिंगोली ) येथे सुरु करून समारोप नुकताच पंढरपूर येथे करण्यात आला. चारशे किलोमीटरचे अंतर पाच जिल्ह्यातून पायी प्रवास करत ३८ गावांना भेट देत दिंडीने मार्गक्रमण केले.
वृक्ष लागवड,संतांचे पर्यावरण संबंधी विचार, शेतकऱ्याची आर्थिक उन्नती, विषमुक्त अन्न ,पारंपरिक भाजीपाला जतन, शास्वत ग्राम विकास आदी बाबत जनजागृती करत ह्या दिंडीने प्रवास केला. गावोगावी बियांचे वाटप करून आषाढी एकादशीला भेट दिलेल्या गावांना विठ्ठलाच्या नावे “विठ्ठलाचे झाड” लावण्याचे आवाहन करण्यात आले. १९ मे रोजी विठ्ठलाच्या दर्शनाने दिंडीची सांगता करण्यात आली. सांगता समारंभ गुरू माऊली गुरुकुल पंढरपूर येथे संपन्न झाला. सांगता समारंभाचे अध्यक्ष म्हणून माऊली गुरुकुल चे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली पवार हे होते . उद्घाटक माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे होते. सोलापूरचे महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांची विशेष उपस्थिती होती. सुरेश पवार, प्रा. परमेश्वर झांबरे,उद्योजक शशिकांत कराळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वृक्षदिंडीतील सहभागी अणासाहेब जगताप, कवी तथा प्रकाशक डॉ. विनायक येवले, प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे, शेतकरी राजेश चव्हाण हे उपस्थित होते.
याप्रसंगी सावंत यांनी आपले वृक्ष लागवडीचे अनुभव सांगितले. मुलांच्या निरोगी जगण्यासाठी शिक्षकच अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतो. शिक्षक आमदार असताना मी वेगवेगळ्या विषयावरती काम केले त्याचवेळी प्रत्येक शिक्षकाला एक फळ झाड भेट दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. उन्हाचा पारा चढलेला असताना शिक्षकांनी शेतकरी वृक्ष व संत साहित्याला अनुसरून काढलेली दिंडी ही महत्त्वाचा संदेश देते . वृक्ष दिंडीचे प्रवर्तक अणासाहेब जगताप यांनी दिंडीतील अनुभव सांगितले. शशिकांत कराळे,सुरेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दिंडीच्या वतीने गुरुकुलातील विद्यार्थी व उपस्थितांना लाल हादगा, समिंदर शोक, बहावा आदी भाजीपाला,फळ झाडे, देशी वृक्षांच्या बियाचे वाटप करण्यात आले. मुलांनी रोपवाटिका कशा कराव्यात यावरती मार्गदर्शन करण्यात आले.
मान्यवारांचे हस्ते वृक्ष दिंडीतील सहभागी अण्णासाहेब जगताप(परभणी) , डॉ विनायक येवले(नांदेड), प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे(नाशिक), राजेश चव्हाण( हिंगोली) यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प सच्चिदानंद महाराज यांनी केले तर आभार प्रा परमेश्वर झांबरे यांनी मानले.