
व्यक्तीचे नैतिक वर्तनच त्याच्या चारित्र्याचे खरे प्रतिबिंब
– न्यायाधीश बी. व्ही. वाघ
यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयात अभिरूप न्यायालय स्पर्धा संपन्न
पुणे : व्यक्तीचे नैतिक वर्तनच त्याच्या चारित्र्याचे खरे प्रतिबिंब असते असे प्रतिपादन पुणे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांनी केले. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय आयोजित अभिरूप न्यायालय स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शुभदा घोलप व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे भगवानराव साळुंखे, बी. डी. गायकवाड, शरद मडके, व्ही. करकंडे उपस्थित होते
न्यायाधीश बी. व्ही. वाघ म्हणाले , ” नैतिकता व सदाचाराच्या मूल्यांवर आधारित जीवन आणि व्यवसायिक कारकिर्दीचा स्पष्ट आराखडा तयार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर आत्मपरीक्षणशील राहावे. ”
या स्पर्धेत देशातील एकूण 15 संघानी सहभाग नोंदविला. स्पर्धा प्राथमिक व अंतिम अशा दोन टप्प्यांमध्ये पार पडली, त्यामध्ये स्पर्धकांनी दिलेल्या प्रकरणावर युक्तिवाद सादर करत न्यायालयीन कार्य पद्धतीचे प्रभावी अनुकरण केले. युक्तीवादातील कायदेशीर मुद्यांची स्पष्टता, न्याय निवाड्यांचा संदर्भ, सादरीकरणातील शिस्त व आत्मविश्वास या निकषांवर स्पर्धकांचे परीक्षण करण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण मुंबई उच्च न्यायालय, छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी केले. या स्पर्धेत नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय हा संघ प्रथम क्रमांकाने विजेता ठरला. एम. आई. टि. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी या संघाने द्वितीय पारितोषिक पटकाविले. तसेच सर्वोत्कृष्ट युक्तिवादाचे पारितोषिक डी. एम. हरीश स्कूल ऑफ लॉ व बालाजी स्कुल ऑफ लॉ या संघाना विभागून देण्यात आले . त्याच बरोबर सर्वोत्कृष्ट मेमोरियल हे पारितोषिक नांदेड तेथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय या संघाला मिळाले.
पारितोषिक वितरण समारोहावेळी न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक अनुभवांवर आधारित प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी वकिली ही एक परफॉर्मिंग आर्ट असल्याचे नमूद करत अनुभव, कौशल्ये आणि विषयावरील प्रभुत्व यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभावी सादरीकरणासाठी निरीक्षणशक्ती अत्यंत आवश्यक असून जीवनातील प्रत्यक्ष अनुभवांमधून शिकणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी पुस्तकी व पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज व्यक्त करत त्यांनी संभाषण कौशल्ये, युक्तिवाद करण्याची कला, संवाद कौशल्य, आणि शिस्त यावर भर दिला. विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःचे शिक्षक बनावे आणि पारंपरिक पद्धतींच्या पुढे जाऊन स्वतःला घडवावे असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शुभदा घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. रवींद्र पाटील व प्रा. डॉ. नितीन चलवादी यांनी पार पाडले.