इंडियामध्ये चकचकीत मॉल आहेत, उंचच उंच इमारती आहेत, झगमगाट असलेले रस्ते, मेट्रो शहरं आणि महासत्तेच्या गप्पा आहेत. पण आपल्या भारतात? तिथे भयंकर गरिबी आहे, एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, कष्ट करून लेकरा-बाळांना पोटभर अन्न मिळावं म्हणून जीवावर उदार होणारी माणसं आहेत. दारिद्र्यात जगणाऱ्यांची गर्दी आपल्या भारतातच आहे.
हे सगळं सांगायचं कारण म्हणजे कोथरूडमधील गाय पारधी वस्तीमध्ये घेतलेला माझा अनुभव. त्या अनुभवातून भारत आणि इंडिया यामधील संघर्ष स्पष्ट जाणवतो.
मधल्या काळात मला एका मोठ्या अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. साधारण वर्षभर आम्ही हा प्रोजेक्ट राबवला. त्यानंतर काही कारणांमुळे त्यांनी हे काम थांबवलं. आमचं काम म्हणजे सिग्नलवर भिक्षा मागणारी, फुलं, लिंबू-मिरची विकणारी, प्लास्टिकच्या पिशव्या विकणारी मुलं यांना निवासी शाळेत दाखल करणे आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करणे, असं होतं.
अधिकाऱ्यांनी काम थांबवल्यावरही हे कार्य पुढे नेण्याची माझ्या मनात इच्छा होती. अनेक दिवसांच्या विचारांती आणि चर्चेनंतर ‘ज्योतिबा सावित्री फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली. कोथरूडमधील ही वस्ती—जी मेट्रो शहराच्या मोठ्या बंगल्यांच्या परिसरात असली तरीही अतिशय वंचित आहे—मी प्रत्यक्ष पाहिली आणि अनुभवली.
बराच काळ लोटल्यानंतर मी पुन्हा फिल्डवर सर्वे करण्यासाठी आणि काम सुरू करण्याच्या उद्देशाने तिथे पोहोचलो. वस्तीमध्ये प्रवेश करताच पत्र्याच्या चाळी दिसल्या. तुंबलेल्या गटारांचं दर्शन झालं, घाणीचा आणि दुर्गंधीचा भयंकर त्रास झाला. गटारांमध्ये मोकाट डुक्कर लोळत होते. तिथली आरोग्य व्यवस्था अत्यंत वाईट होती. नागरिक मूलभूत गरजांपासूनही वंचित होते.
अचानक माझ्या पाठीमागून एक महिला आली आणि म्हणाली, “ए भाऊ, माझ्या लेकरांना शाळेत टाक की.” मी म्हणालो, “मी त्यासाठीच आलो आहे.” तिने तिची तीन लेकरं दाखवली. मी म्हणालो, “उद्या या लेकरांना शाळेत घेऊन जाऊ.” ती म्हणाली, “उद्या शनिवार आहे, आमच्या धंद्याचा दिवस आहे.” मी विचारलं, “कोणता व्यवसाय?” तिने लिंबू-मिरची दाखवली आणि सांगितलं, “शनिवारी सिग्नलवर जाऊन आणि वस्त्यांमध्ये फिरून विकते. शनिदेवाचा वार असल्याने या दिवशी विक्री चांगली होते. त्यातून जो पैसा येतो, तो घरखर्चालाच लागतो.”
मी सहज विचारलं, “लिंबू-मिरची लावण्याचा काय फायदा?” ती म्हणाली, “घर-दारा आणि कुटुंबावर वाईट नजर नको म्हणून लोक लिंबू-मिरची लावतात.” माझ्या मनात विचार आला—या माऊलीला इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनेच जगणं अवघड करून ठेवले आहे.
ती भगिनी हळूहळू मोकळी होत होती. मुलं उपाशी राहत असल्याचं ती सांगत होती. इच्छा असूनही चांगलं खायला मिळत नाही. मुख्य कारण म्हणजे पैशांची टंचाई. एकदाच शिजवलेलं अन्न दोन वेळा गरम करून खावं लागतं. या संघर्षातच तिने नवऱ्याची कहाणी सांगायला सुरुवात केली. “माझी लेकरं उपाशी मरतात, कर्जाचा डोंगर आहे, घरात दुःख आहे. हे सगळं पाहून माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली,” ती म्हणाली. ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. लेकरांना पोटभर खाऊ घालू शकत नाही, कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकत नाही, आरोग्याच्या समस्या आणि औषधांसाठी पुरेसं पैसे नसल्याने त्याने जीवन संपवलं.
ती तिच्या आयुष्याची कहाणी सांगत असताना तिने मुलीकडे पाहिलं आणि म्हणाली, “भाऊ, या माझ्या मुलीला त्वचेचा भयंकर आजार आहे. मोठ्या दवाखान्यात न्यायला पैसे नाहीत. माझ्या नवऱ्याने तरुणपणीच मला विधवा केलं. कसा का असेना, पण तो हक्काचा आधार होता. आता मी फक्त लेकरांसाठी जगते. माझ्या आंधळ्या आईला आणि सासू-सासऱ्यांना मीच बघते.” ती म्हणाली, “भाऊ, पडेल ते कष्ट करण्याची तयारी आहे. माझी लेकरं शिकली पाहिजेत, मोठी साहेब झाली पाहिजेत. आमच्या वाट्याला आलेलं दुःख त्यांच्या वाट्याला येऊ नये.”
आमच्या गप्पा ऐकणारा एक लहान मुलगा हळूच म्हणाला, “दादा, मला पण शिकायचं आहे. मोठं व्हायचं आहे. मोठं झालो की चांगले कपडे मिळतील, हॉटेलमध्ये जेवायला मिळेल.” त्याच्या निरागस बोलण्याने मन सुन्न झालं. परिस्थिती माणसाला समजदार बनवते आणि त्याला वयाचं बंधनही नसतं. ही मुलं दिवसभर सिग्नलवर फुलं विकतात, लोकांच्या अपमानाला सामोरं जातात आणि गरिबीचं जगणं भोगतात.
ही मुलंही स्वप्न पाहतात—”शर्ट घालून स्कूलबसने शाळेत जायचं.” एवढंच काय ते जगण्याचं स्वप्न बाळगून जीवनाचा जुगार खेळून ते जगत असतात. आपल्या देशात कोणतीही व्यक्ती गरीब राहू नये, प्रत्येकाला मोफत आरोग्य आणि शिक्षण मिळावं, कोणालाही उपाशी झोपावं लागू नये, हेच मी माझ्या स्वप्नात पाहतोय. आपण सर्वांनी मिळून हे स्वप्न साकार करायला हवं!