‘शहरी वस्त्यांमधील दृष्टचक्र’
शहरीकरणामुळे नव्वदच्या दशकात पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये वस्त्यांची संख्या झपाट्याने वाढली. या वस्त्यांमध्ये महापालिकेच्या वतीने नळाद्वारे पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छतागृहे, गल्लीबोळातील काँक्रीटीकरण, अंतर्गत रस्ते, पददिवे अशा मूलभूत सुविधा दिल्या. यासह मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करून मोफत शिक्षणाची सोय सुद्धा केली गेली आहे. शहरी वस्त्यांमध्ये डझनभर स्वयंसेवी संस्था (एनजीओ) काम करीत आहेत. तरीसुद्धा येथील शाळागळतीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे मुलांमध्ये आलेली व्यसनाधीनता, गुन्हेगारी, बेरोजगारी हे दृष्टचक्र काही थांबत नाही. अशा शहरातील वस्त्यांमधील सद्यस्थितीचा घेतलेला मागोवा.
वस्त्यांमधील शाळा गळतीचे मोठे प्रमाण; व्यसनाधीनता व गुन्हेगारीची सुरुवात
महापालिकेच्या शाळेत सहज व आनंददायी शिक्षणाचा अभाव
येरवडा : शहरात ५३४ वस्त्या आहेत. यामध्ये महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने तीनशे पेक्षा जास्त प्राथमिक तर २२ माध्यमिक शाळांची संख्या आहे. या सर्व मराठी माध्यमांच्या शाळा अनुदानित असल्या तरी महापालिकेने २००० नंतर विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने कमी होत गेली. तर इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांच्या कौशल्यक्षमतेच्या अभावामुळे ते विद्यार्थ्यांना सहज आणि आनंददायी शिक्षण देण्यास कमी पडू लागले. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून इयत्ता सातवी व दहावीनंतर शाळा गळतीचे प्रमाण अधिक वाढले आहे.
शहरी वस्त्यांमधील महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळा विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात असल्यामुळे त्या टिकून राहिल्या. मात्र, आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली. त्यांना नीट वाचता येत नव्हते की गणितातील आकडेमोड जमत होते. त्यामुळे आठवीनंतर शाळा गळतीचे प्रमाण अधिक वाढले. पालकांचे विद्यार्थ्यांकडे असलेले दुर्लक्ष किंवा पालकच व्यसनाधीनतेमध्ये असल्यामुळे त्यांची मुले सहाजिकच व्यसनाधीनतेकडे वळली.
शाळेच्या शंभर मीटर अंतराच्या आत पानटपऱ्या
शहरातील दाट लोकवस्तीमुळे वस्त्यांची सीमारेषा व येथील शाळांची सीमारेषा कळत नाही. त्यामुळे शाळेच्या अगदी लागून अनेक पानटपऱ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहज गुटखा, सिगारेट आणि तंबाखू उपलब्ध होतेच असे नाही तर उपलब्ध करून दिले जात असे म्हणावे लागेल. त्यामुळे अनेकांना विद्यार्थिदशेपासून गुटखा, सिगारेट व तंबाखूचे व्यसन लागते. वस्त्यांमध्ये गल्लीबोळात आता गांजा मिळत असल्यामुळे गुटखा व सिगारेटची जागा गांजाने घेतली आहे. शाळा गळतीचे वाढलेले प्रमाण, मुलांमधील व्यसनाधीनतेचा बेरोजगारीचा फायदा घेऊन अनेक गुन्हेगार टोळ्या अशा मुलांना लक्ष करून त्यांना टोळीत सहभागी करून घेत आहेत. त्यामुळे वस्त्यांमधील अनेक अल्पवयीन मुले गांजाच्या आहारी गेले आहेत. अनेकजण उदरनिर्वाहासाठी गुन्हेगारी टोळ्यांमध्ये राहत आहेत. वस्त्यांमध्ये संघटित गुन्हेगारांची संख्या वाढत असल्याचे वास्तव आहे.
अल्पवयीन मुली गुन्हेगारी टोळींच्या संपर्कात
वस्त्यांमधील गरीब व सुंदर विद्यार्थिनींना हेरून त्यांना पैशाचे आमिष देऊन गुन्हेगारी टोळीच्या संपर्कात आणले जात आहे. त्यासाठी अनेक महिला दलाल कार्यरत आहेत. याचा थांगपत्ता ना स्थानिक पोलिसांना आहे ना लोकप्रतिनिधींना. गुन्हेगारी टोळ्या मुलींना पैसे, महागड्या मोबाईल, अमली पदार्थ देऊन त्यांना आपल्या टोळीत सहभागी करून घेतात. त्यांच्या मार्फत अमली पदार्थ पोचविण्याचे नेटवर्क तयार करतात. त्यामुळे कोणालाही त्यांचा संशय येत नाही.
‘‘शहरातील वस्त्यांमध्ये व्यसनाचा विळखा पडला आहे. मुला-मुलींचे पालक दोघेही कामाला जातात. त्यामध्ये किशोरवयीन मुलींच्या शारीरिक व मानसिक बदल होताना त्यांच्या आईची सोबत मिळत नाही. अशा मुलींना मैत्रीण किंवा मित्राची वाईट संगत मिळाल्यास ते पैशाच्या किंवा अमली पदार्थांच्या आहारी जातात. याचे भयावह वास्तव वस्त्यांमध्ये सध्या दिसत आहे. त्यावर वेळीच उपायोजना करण्याची गरज आहे.’’
– विजय शिवले, प्रमुख, सुराज्य सर्वांगीण विकास संस्था
गुन्हेगारी टोळी प्रमुख कारागृहात, तर त्याच्या चेल्यांची वस्तीत दहशत
येरवड्यातील अनेक गुन्हेगारी टोळीचे प्रमुख येरवडा कारागृहात आहेत. मात्र, त्यांचे अल्पवयीन गुन्हेगार मुले वस्त्यांमध्ये दहशत निर्माण केली आहे. ते अमली पदार्थांच्या विक्रीमध्ये गुंतले आहेत. अमली पदार्थ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. यामध्ये दलाल महिला वस्त्यांमधील गरीब व गरजू विद्यार्थिनींना जाळ्यात अडकवत असल्याचे समोर आले आहे. त्या दृष्टीने तपास करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.