५८ लाख वृक्षांना मिळाली ‘ओळख’
संरक्षणामुळे वृक्षतोड अशक्य ; वृक्ष तोडणा-यांवर कडक कारवाई
पुणे ः शहरातील वृक्ष गणना ५८ लाखा पर्यंत पोहचली आहे. यामध्ये वड, पिंपळ, आंबा, उंबर, ताम्हण, रिठा, पळस, बेहडा अशा देशी वृक्षांची संख्या सर्वाधिक आहे. अशांश व रेखांशमुळे प्रत्येक वृक्षाचे स्थान निश्चित झाल्यामुळे ते तोडणे आता अशक्य झाले आहे. त्यामुळे शहरातील प्राणी, पक्षी, कीटक, किडे, फुलपाखरांच्या अन्नसाखळीसह त्यांचे आदिवास आता संरक्षित होणार असल्याची माहिती पुणे महापालिका मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुणे शहरातील वृक्ष गणना ‘सार आयटी रिसोर्सेस‘ च्या माध्यमातून सुरू आहे. या प्रत्येक वृक्षाच्या छायाचित्रासह त्याचे स्थान निश्चितीसाठी अशांश व रेखांश आदी माहिती संगणकावर संकलीत करण्यात आली आहे. यामुळे काही महिन्यानंतर संगणकावर एका क्लिकवर शहरातील वृक्षांचे प्रकार, संख्या, त्याचे स्थान समजू शकणार आहे. गेल्या काही वर्षांपासून ही वृक्ष गणना सुरू होती. ही वृक्ष गणना आता पुर्ण झाली आहे. पुणे शहरात देशी आणि विदेशी वृक्षांची संख्या लक्षणीय आहे. कोरेगाव पार्क, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तळजाई, वेताळ टेकडी आदी परिसर विविध देशी वृक्षांनी नटलेले आहे.
‘‘ शहरातील वृक्ष गणनेचे काम पूर्ण झाले आहे. आता पर्यंत ५८ लाख वृक्षांची गणना पूर्ण झाली आहे. वृक्ष गणनेत अंदाजे साडेनऊ कोटी रूपये खर्च झाले आहेत. सार आयटी वृक्ष गणना यांच्याकडे कामाची देखभाल पुढील तीन वर्षांपर्यंत आहे.’’
– अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक, पुणे महानगरपालिका‘‘ शहरात नैसर्गिकपणे आलेली वड, पिंपळ, चिंच, आपटा, कडुलिंब, उंबर, कदंब, आवळा, फणस,आंबा, बेल, पळस, जांभूळ, सिताफळ, पांगारा, बेल आदी नव्वद प्रकारचे देशी वृक्ष टिकून आहेत. त्यामुळे प्राणी, पक्षी, कीटकांचे आदिवास टिकून आहेत. तर गुलमोहर, सुबाभूळ, सप्तपर्णी, रेन ट्री यांसारख्या विदेशी वृक्षांचे रोपण मानव निर्मित आहे. त्याचा मानवासह प्राणी, पक्ष्यांना काहीच उपयोग नाही. ‘‘
– रघुनाथ ढोले, संस्थापक, देवराई फाउंडेशनदेशी झाडांचे महत्त्व
देशी झाडे पर्यावरणाचा समतोल राखतात. हे वृक्ष प्राणी, पक्षी, कीटकांचे आदिवास आहेत. त्यांना अन्न व निवारा मिळतो. पर्यायाने मानवासोबतच त्यांचे ही जीवनचक्र सुरळीत सुरू असते.