राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

राज्य महिला आयोगाच्या आरोग्य वारीउपक्रमाचे

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे: राज्य शासनाने आषाढी वारीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात येत असून राज्य महिला आयोगानेही वारीदरम्यान महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळीतील अडचणीला लक्षात घेऊन सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग यंत्रे, नष्टीकरणासाठी इन्सीनरेशन यंत्रे आदी उपलब्ध करुन देण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उद्घाटन निवडुंगा विठोबा मंदिर येथे करण्यात आले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे, पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम, सुनील बल्लाळ, माजी नगरसेवक विशाल धनवडे आदी उपस्थित होते.

  वारीसाठी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये अनुदान दिले आहे. पंढरपूर येथे दर्शनबारी उभी करण्यासाठी ७३ कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. या बारीत एकाच वेळेस ६ हजार लोक या दर्शनबारीत असतील तसेच या इमारतीमध्ये बारीमध्ये असताना बाकडे, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतेची आदी सुविधा उपलब्ध असतील. पूर्वी पालखीच्या मार्गावर शौचालयांची सुविधा खूप कमी असल्याने अस्वच्छता होत असे. मात्र मोठ्या प्रमाणात फिरत्या स्वच्छतागृहांची मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था केली आहे.

शहरात सॅनिटरी नॅपकीन विक्रीसाठी स्वच्छसंस्थेच्या महिलांनी पुढाकार घ्यावा

            आयोगाने सॅनिटरी नॅपकीन पुरवण्यासाठी चांगला पुढाकार घेतला आहे. एक रुपयाला एक सॅनिटरी पॅड याप्रमाणे १० उत्कृष्ट गुणवत्तेच्या पॅडचे पाकीट १० रुपयाला देण्याची केंद्र शासनाची योजना आहे. पुणे शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेच्या महिलांनी ५ रुपयांना एक पाकीट आपल्या भागातील महिलांना विकल्यास त्यांना अडीच रुपयांना हे पॅक देऊ. त्यासाठी पुढाकार घेईल, असे  पाटील यांनी सांगितले. त्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन न वापरणाऱ्या मोठ्या प्रमाणातील महिलांपर्यंत ते पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिलांनी संघटित होण्यासाठी महिला आयोगाने सुरू केलेला हा आरोग्य वारीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. राज्य शासनाने वारीसोबत मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये अजून बदल करता येऊ शकतील. वारकरी महिलांनी स्वत:च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने टारगटपणा करणाऱ्यांचे छोटे १ मिनिटांचे व्हिडिओ काढून पाठवावेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाही करावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

      चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाच्या वतीने गेली ४ वर्षे हा उपक्रम राबविला जातो. देहू आळंदीची वारी २२ दिवस तर मुक्ताईनगर येथून ३० दिवस चालते. त्यामुळे महिलांच्या मासिक पाळीचा प्रश्न निर्माण होत असतो. हे लक्षात घेऊन आयोगाने हा पुढाकार घेतला आहे. हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन आदी सुविधा प्रत्येक १० ते १२ किलोमीटर अंतरावर केल्या आहेत.

Recent Comments

No comments to show.
Categories
Loading Next Post...
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...